Posts

Showing posts from February, 2026

वेध विज्ञानाचा

Image
  सूर्य उगवला ज्ञानाचा,अंधार आता संपला. शक्ती मिळाली चालायला, वाट लागली दिसायला !! विश्व हे धुक्यात हरवले होते, अंधश्रद्धेने गुरफटले होते, विज्ञानातून सत्य आले प्रत्ययला, आता अंधार अज्ञानाचा संपला  !! गुपित कळाया सृष्टीचे, श्वास झाले ध्यास ज्यांचे. दुःख पीडितांचे जाता, सौख्य लाभलेले तयाना. हात मानवाचे आता,आकाशी पोहचलेले. नविन आव्हान पेलायाला,सवय झाली आम्हाला !! =शब्दांकन= प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे (पोलीस क्राईम न्यूज ब्यूरो चीफ) साकुरी. ता. राहता. जिल्हा.अहिल्या नगर.. संपर्क.9604797316

राष्ट्रीय विज्ञान दिन

Image
  भारतामध्ये दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महान भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ हा दिवस पाळला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी त्यांनी “रमण परिणाम” (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाची घोषणा केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानामुळे मानवी जीवनात अमूलाग्र बदल घडून आले आहेत. विविध आधुनिक तंत्रज्ञान, संप्रेषण साधने, आरोग्यसेवा, वाहतूक व्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमुळे आपले जीवन अधिक सुलभ, वेगवान आणि सोयीस्कर झाले आहे. मोबाईल तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, परिसंवाद आणि व्याख्याने आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि संशोधनाची प्रेरणा मिळावी हा यामागील मुख्य उद्देश असतो. वि...

कुलदीप शेंडे यांनी केली पत्रकारांची नाराजी दुर बैठकीत सकारात्मक निर्णय....

Image
  खोपोली /मानसी कांबळे :- खोपोली नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे शहरातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. नगरप्रशासनाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यायचा अथवा नाही, याबाबतचा निर्णय हा नगराध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात येतो. नुकत्याच पार पडलेल्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने या निर्णयाविरोधात खोपोलीतील पत्रकारांनी एकत्र येत भूमिका घेतली. दि. २५ फेब्रुवारी रोजी खोपोलीतील विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले. वैयक्तिक संघटनांना बाजूला ठेवत “खोपोली-खालापूर पत्रकार कृती संघटना” या नावाने संयुक्त व्यासपीठ स्थापन करण्यात आले. या बैठकीत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासमोर कोणते मुद्दे मांडायचे, तसेच पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश नाकारणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, यावर सखोल चर्चा करण्यात आली. यानंतर दि. २६ फेब्रुवारी रोजी खोपोली-खालापूरमधील सर्व पत्रकारांनी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. सभेत प्रवेश नाकारण्यामागील नेमके कारण...

विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करा : बी. एच. गायकवाड यांचे मार्गदर्शन

Image
  व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड जिल्हा / प्रतिनिधी :- भारतीय बौध्द महासभा यांच्या माध्यमातून विविध प्रकारची २४ शिबिरे आयोजित केली जातात. त्यापैकी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिर हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या शिबिराच्या माध्यमातून बौद्धिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येकाने सातत्याने वाचन करून स्वतःची बौद्धिक उन्नती साधावी. विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांनी केले. तसेच जिल्हा शाखेच्या कार्याचे त्यांनी कौतुकही केले. महासभेच्या जिल्हा शाखा (उत्तर) यांच्या वतीने मोहपाडा येथे रविवारी (दि. २२) व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, सभासद नोंदणी मोहिमेचे उद्घाटन आणि जनगणना २०२६ संदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. यावेळी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. एस. एस. वानखेडे, जिल्हाध...

माय मराठी

Image
  मराठी भाषाआहे;माझी फार गोड जगामध्ये मराठी ;भाषेस नाही तोड  चवी साऱ्या त्यात ;कडवी;तिखट गोड मराठीभाषा कायमची ;राहती हृदयात गाथा तुकोबाची; ओवी जनाईची तिच्याचरणी माथा ;टेकू सारे जण. हरिपाठ माऊलीचा; भारुड नाथांचे आनंद भरलेला ;जीवनात काठोकाठ. किर्तन ;भजन; देहभान विसरे जगतात माझी ;मराठीच महान. साहित्याचे आहेत; अनेक प्रकार मराठी भाषा जणु !थेंब अमृताचे. नटते शब्दांनी ;थटते अलंकारानि ओघळती मोती; जणू ओठांतूनी. आहे अभिमान;माझ्या मराठीला मान  मराठी माय माझी; महाराष्ट्राची शान. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सा कुरी ता.राहता जिल्हा अहिल्या नगर   मो.9604797316

वाढीव पाणीपट्टीविरोधात 6 मार्च रोजी धरणे आंदोलनाचा इशारा...

Image
  अहिल्यानगर/ज्ञानेश्वर बनसोडे :- देवळाली प्रवरा नगरपरिषदेत सर्वसाधारण सभेत पाणीपट्टीत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 1,800 रुपये असलेली पाणीपट्टी थेट 3,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या वाढीव दराविरोधात नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नगरसेविका थोरात यांनी सांगितले की, ही वाढ अवाजवी असून नागरिकांना न परवडणारी आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील अनेक कुटुंबे हातावर पोट भरणारी व मोलमजुरी करणारी आहेत. त्यांना नियमित रोजगाराची हमी नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च भागविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पाणीपट्टीत एकदम 1,200 रुपयांची वाढ करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. हा निर्णय नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचा आरोप करत, नगरपरिषद प्रशासनाने गरीब नागरिकांची परिस्थिती लक्षात घेऊन वाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून, 6 मार्च 2026 रोजी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे ...

एस टी बस चालक. सर्जेराव दत्तात्रय देठे यांचे सेवा पूर्ती सोहळ्याचे आयोजन

Image
  विना अपघात सलग 29 वर्ष सेवा  अहिल्या नगर/प्रा ज्ञानेश्वर बनसोडे :- अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सर्जेराव दत्तात्रय देठे यांचा परिवहन महामंडळाच्या कोपरगाव आगारातून सेवा पूर्ती सोहळा 28 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केला आहे. त्यांनी 29 वर्ष विना अपघात सेवा बजावली आहे. श्री देठे यांना या सोहळ्यात विशेष गौरविण्यात येणार आहे. त्यांचे कुटुंब सुसंस्कृत व धार्मिक आचरण असलेले आहे. ते राहुरी कृषी विद्यापीठातील शासकीय कर्मचारी श्री प्रविण बाळासाहेब देठे यांचे चुलते व ज्येष्ठ पत्रकार प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांचे व्याही आहेत. सदर कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन श्री सर्जेराव देठे यांनी केले आहे.

खोपोलीतील आदिवासी वाड्यांमधील समस्यांबाबत नगरपालिकेत निवेदन

Image
  खालापुर कर्जत / सुधीर देशमुख :-खोपोली शहरातील विविध आदिवासी वाड्यांमधील समस्या सोडविण्यासाठी आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी खोपोली नगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले की, खोपोली शहरातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण, वीज, रस्ते व वाहतूक अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तसेच जातीचा दाखला व इतर शासकीय कागदपत्रे मिळवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, अनेक नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. आदिवासी वाड्यांमधील प्रमुख समस्या : 1. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कमतरता. 2. आरोग्य सुविधा अपुऱ्या असणे. 3. शैक्षणिक सुविधा व शाळांची गैरसोय. 4. रस्ते व वाहतुकीची समस्या. 5. वीजपुरवठ्याचा अभाव. 6. जातीचा दाखला व शासकीय कागदपत्रांतील अडचणी. 7. शासकीय योजनांचा लाभ न मिळणे. या समस्यांमुळे आदिवासी नागरिकांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास खुंटत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे साहेब व उपनगराध्यक्ष विक्रम साबळे साहेब यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागातील अ...

धगधगत्या ज्वाळांमध्ये जीवाची धडपड आणि मानवतेचा विजय!

Image
   खोपोली /प्रतिनिधी :- खोपोली शहरातील लव्हेज गावाजवळील डोंगरपट्ट्यामध्ये भीषण वणवा पेटला होता. सर्वत्र धूर, आगीच्या ज्वाळा आणि भीतीचे वातावरण होते. अशा संकटाच्या क्षणी वनकर्मचारी आणि स्थानिक आदिवासी जीवाची पर्वा न करता वणवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांच्या नजरेस एक हृदयद्रावक दृश्य पडले, तेथे अजगर जातीचा साप धगधगत्या ज्वाळांमधून जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ वनपाल भगवान दळवी यांच्या माध्यमातून हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधला. क्षणाचाही विलंब न करता गुरुनाथ साठेलकर आणि दिनेश ओसवाल यांनी घटनास्थळी धाव घेत वनपाल भगवान दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सात ते आठ फूट लांबीच्या अजगराला अत्यंत दक्षतेने सुरक्षित पकडले.  सभोवताली पेटलेल्या वणव्याच्या ज्वाळांमधून मार्ग काढत त्या अजगराला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तज्ज्ञांकडून त्याच्यावर आवश्यक उपचार करून त्याला सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात येणार आहे. अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली. ही केवळ एका सापाची सुटका नव्हे, तर मानवतेने निसर...

धोकादायक ड्रेनेज टँकमधून गाभण गायीची सुखरूप सुटका; दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

Image
  खोपोली /प्रतिनिधी :- खोपोली शहरातील मोगलवाडी डीपी रस्त्यालगत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या ड्रेनेज टँकचे झाकण तुटल्याने एका गाभण गायीचा टँकमध्ये पडून अपघात झाला. टँकमध्ये सुमारे सात ते आठ फूट पाणी साचलेले असल्याने गायीला हालचाल करण्यास पुरेशी जागा नव्हती. घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गायीच्या मालकांकडून ती गाय गाभण असल्याची माहिती मिळाल्याने बचावकार्य अधिक काळजीपूर्वक राबविण्यात आले. प्रथम सक्शन पंपाच्या सहाय्याने टँकमधील काही प्रमाणात पाणी उपसण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्रणा आणि मानवी साखळीच्या मदतीने टँकची भिंत नियंत्रित पद्धतीने फोडण्यात आली.  जवळपास दोन तास सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर गायीला कोणतीही गंभीर इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.या धाडसी आणि समन्वयपूर्ण बचावकार्यासाठी खोपोली नगरपालिकेचे परिवहन सभापती किशोर पाटील यांनी दोन्ही पथकांचे कौतुक केले. तसेच गायीच्या तपासणी व उपचारासाठी पशुवैद्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले. दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती ह...

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर

Image
  श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार" रायगड/अलिबाग :-   कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.           कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत कर्जतचे तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते.        जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन होताच आश्रमशाळेतील लेझीम पथकाने पारंपारिक थाटात त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील 'अखंड भारताच्या' नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी...

२१ टन प्रोपिलीन गॅस टँकरचा ब्रेक फेल; सुरक्षा यंत्रणांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Image
  रायगड /प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्याच्या हद्दीत आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजताच्या सुमारास एक संभाव्य भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कोचीहून गुजरातकडे २१ टन क्षमतेचा प्रोपिलीन (Propylene) गॅस वाहून नेणारा टँकर (वाहन क्रमांक: NL.01 AF.5040) बोरघाट परिसरात येत असताना चालकाच्या लक्षात आले की वाहनाचे ब्रेक निकामी झाले आहेत. समोर तीव्र उतार आणि धोकादायक वळणे असल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला असलेल्या आरसीसी रिटेनिंग वॉलला जाणीवपूर्वक धडक देत टँकर नियंत्रित केला. त्यामुळे टँकर जागीच थांबला आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट, आयआरबीची पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणेची फायर ब्रिगेड, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान तसेच हेल्प फाउंडेशनची टीम आणि पेट्रोलिंग वाहनांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.  हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध यांनी टँकरची तांत्रिक स्थिती, दाब, गळतीचा धोका ...

गोपनीय माहितीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रणजितसिंह खराडे व त्यांच्या टीमची धडक मोहीम

Image
  टायर ट्यूबमध्ये दडवलेली अवैध दारू व वाहन जप्त; गुन्हा अन्वेषण पथकाची धडाकेबाज कामगिरी खालापुर /प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यात अवैध दारूची विभागाच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ट्यूबमध्ये चलाखीने दारू भरून चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल,अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रणजीतसिंह खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ पथक तयार करण्यात आले. पोलीस हवालदार खराडे यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार खालापूर तालुक्यात मौजे कुंभीवली येथे एका संशयित वाहन अडवून झडती घेण्यात आली असता टायर ट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.या कारवाईत ट्यूबमध्ये भरलेली २४,०००/-रुपये किमतीची २४० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसेच ९५,०००/-किमतीचे वाहन क्रमांक MH 06 AB.7517 टाटा कंपनीची इंडिका डीलक्स वाहन अ...

हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त २३ फेब्रुवारी रोजी सामूहिक गीत गायन

Image
  कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी होणार सहभागी कोकण विभागीय आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले आवाहन नवी मुंबई /प्रतिनिधी :- शिखांचे नववे गुरु, "हिंद दी चादर" परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.     या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.        कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे.   * जागतिक विक्रमाची नोंद...*      या विशेष उपक्रमाची दखल 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्...

पळस्पे येथे महामार्ग सुरक्षा पथकाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन.

Image
  अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते देवदूत स्वयंसेवकांचा गौरव खोपोली /प्रतिनिधी :- रस्ते सुरक्षा अभियान २०२६ च्या समारोप कार्यक्रमानिमित्त रायगड परिक्षेत्रातील महामार्ग सुरक्षा पथकाच्या पळस्पे येथील नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. रायगड परिक्षेत्रात वाढती वाहतूक, सातत्याने घडणारे अपघात आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयाची गरज भासत होती. संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाची जागा निश्चित करून अतिक्रमण हटवले व आवश्यक प्रशासकीय पाठपुरावा पूर्ण करत हे कार्यालय उभारण्यात यश मिळवले. या उपक्रमामुळे महामार्ग सुरक्षा व्यवस्थेला स्वतंत्र व सक्षम अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या कार्यालयामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी,वाहतूक नियमन व सातत्यपूर्ण देखरेख, ई-चलान प्रणालीची काटेकोरपणे राबवता येईल, अपघात नियंत्रण व तात्काळ मदत व्यवस्थेचे बळकटीकरण होईल.  कार्यक्रमात अपघातग्रस्तांना मदत करून जीवनदान द...

डोंगरगण घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली ...

Image
    दोन गोण्यात घालून मृतदेह फेकला घाटात अहिल्यानगर / ज्ञानेश्वर बनसोडे : - राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरा तील डोंगरगण घाटात दोन गोण्यांमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटलीअसून सदरचा मृतदेह हा राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो मृतदेह टाकळीया येथील किरण शिवाजी कवाणे या (वय 32) युवकाचा असल्याचे निदर्शनास आले आहे.या घटनेने राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून मृत्यू मागचे गुढ मात्र गुपितच आहे. मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास दोन वेगवेगळ्या गोण्यांमध्ये मृतदेह घाटात फेकून दिला असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. एमआयडीसी पोलीसानी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासणीत सदरचा मृत् देह हा दोन वेगवेगळ्या गोण्यांमध्ये घालून घाटात फेकून दिला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.त्या मुळे सुरुवातीपासूनच हा घात पात असावा. अशी शक्यता वर्तवली जात होती. मृत व्यक...

शिळफाट्यात शिवजयंती मिरवणूक उत्साहात संपन्न..

Image
  शिवप्रेमी मित्र मंडळाकडून डीवायएसपी विशाल मेहुल पाटील यांचा सत्कार ; नगरसेविकांची उपस्थिती खोपोली / मानसी कांबळे :- शिवप्रेमी मित्र मंडळ, शिळफाटा यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची भव्य मिरवणूक यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, शिवरायांच्या शौर्याची झलक दाखवणारे फलक व घोषवाक्ये यामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या यशस्वी नियोजनाबद्दल आणि शांतता राखण्यासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल डीवायएसपी विशाल मेहुल पाटील यांचा शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सत्कारप्रसंगी नगरसेविका ॲंड. अनिताताई पवार, नगरसेविका उज्जवलाताई महाडिक नगरसेवक हरीश काळे शिवप्रेमी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवजयंती उत्सव शां...

खोपोलीत ‘बहुजन संकल्प’ व ‘रायगड संकल्प’चा 11 वा वर्धापन सोहळा उत्साहात

Image
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळासह विविध सामाजिक संस्थांचा विशेष सन्मान खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगरीत सामाजिक जाणिवा, अभिमान आणि प्रेरणादायी कार्याचा संगम अनुभवायला मिळाला. साप्ताहिक बहुजन संकल्प व रायगड संकल्प न्यूज यांच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळा खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था व व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, नगरसेवक डॉं. सुनील पाटील, ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा वंदना मोरे, खुशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मोनिका कांबळे तसेच नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक - नगरसेविका आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. सभागृ...

माणसात देव शोधणारे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज

Image
   राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव तालुका अंजनगाव सुर्जी या गावात झाला. त्यांचे मूळ नाव डेंबुजी झिंगराजी जानोरकरअसे होते. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची खूप आवड होती. त्यांच्यावर आई-वडिलांचे संस्कारअतिशय चांगल्या प्रकारे झाले होते. समाजातील अंधश्रद्धा. भोळ्या समजुती ;जुन्या चालीरीती ; रुढी प्रथा परंपरा हे समुळपणे नष्ट करण्यासाठी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" म्हणत .आपल्या वऱ्हाडी भाषा शैलीत समाज प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत श्री गाडगे बाबांचे जयंती 23 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.. भुकेलेल्यांना अन्न दया.. तहानलेल्यांना पाणी दया.. व वस्त्रहिन व्यक्तींना वस्त्र दया.गरीब मुलांना शिक्षणात मदत करा. बेघर असलेल्यांना आसरा दया. अंध; विकलांग. बेघर व्यक्तींना आश्रय दया. आजारी व्यक्तींची मदत करा .बेरोजगारांना रोजगार दया. पशु-पक्षी ;मुक प्राण्यांना अभय दया. गरीब कमजोर मुला मुलींच्या लग्नात मदत करा. दुःखी आणि निराश लोकांना ...

गाडगेबाबा यांचे जयंती निमित्ताने स्वच्छता गीत

Image
   स्वच्छतेचे काम करू सुंदरतेने परिसर भरू. गाव स्वच्छ करू हातांनी  गाणी सुंदर गाउ मुखांनी आमचा आहे सुंदर बाणा नाही घानीचा ठाव ठिकाणा स्वच्छतेत जो चुकार त्याचा सर्वत्र धिक्कार आवड स्वच्छतेची निवड सुंदरतेची  स्वच्छ निर्मळ जीवन  सदा सुंदरतेचे वळण आमचे स्वच्छता काम मुखी सुंदरता नाम स्वच्छ परिसर हा ठेऊ  गीत सुंदरतेचे गाऊ      प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे  (पोलिस क्राईम न्यूज चीफ ब्यूरो ) साकुरी. ता. रहाता. जिल्हा. अहिल्या नगर.  मो 9604797316

खोपोली नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या भिंतीवर दात्यांच्या नावाचे फलक पूर्ववत करा ...

Image
  राष्ट्रवादीच्या सौ. जैबुनिसा शेख यांची नगरपालिकेकडे मागणी ​ खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखला जावा आणि नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी जागा दान देणाऱ्या दात्यांच्या नावाचे फलक नवीन इमारतीवर पुन्हा लावण्यात यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षा सौ. जैबुनिसा हामीद शेख यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.  ​ ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दात्यांचे योगदान ​खोपोली नगर परिषदेची स्थापना १ जुलै १९७१ रोजी झाली. त्यानंतर १९७६ मध्ये बाबू शेठ मुल्ला हे थेट जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष ठरले. शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. याच कुटुंबातील दाऊद साहेब गुलाब मोहम्मद मुल्ला आणि मोहम्मद इस्माईल मुल्ला यांनी १९५६ साली दवाखान्यासाठी ३२ गुंठे जागा आणि ३,००० रुपये रोख रक्कम देणगी म्हणून दिली होती. ​ नेमका विषय काय? ​जुन्या दवाखान्याच्या इमारतीवर या दात्यांच्या नावाचे फलक अनेक व...

लाईट बिल जास्त येत असल्याने नागरिकांमध्ये संताप

Image
  * खोपोलीतील ग्राहकांना ‘वाढीव बिलाचा धक्का’ ; महावितरण कार्यालयात धडक मोर्चा * स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचा पुढाकार ; कनिष्ठ अभियंत्यांची भेट खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात महावितरणकडून आकारण्यात येणाऱ्या वाढीव व अवाजवी वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वीज बिलाबाबत सातत्याने तक्रारी करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार अंतर्गत संघटनेच्या वतीने आज 17 फेब्रुवारी 2026 रोजी महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यालय उपविभाग खोपोली (महावितरण कार्यालय) येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्यात आला. यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता बालाजी सहू वाघमोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खोपोलीतील सर्वसामान्य वीजग्राहकांच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या कारवाईदरम्यान हरजिंदर कौर धंजल, गीता गौतम तसेच अंकुश रामचंद्र चंद्रकांत या ग्राहकांचे वीज बिलाबाबतचे प्रकरण सविस्तरपणे मांडण्यात आले. * दोन - तीन वर्षांपासून बिलाबाबत चौकशी ; तर...

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह सापडल्याने कर्जत तालुक्यात खळबळ

Image
  रहस्यमय मृत्यू की अपघात ? 20 - 25 वयोगटातील वैशाली जाधव पाण्यात आढळली ; कर्जत पोलिसांचा सखोल तपास सुरू कर्जत/नरेश जाधव : - कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सदर तरुणी 20 ते 25 वयोगटातील असून काही तासांपूर्वीच ती धरणाच्या पाण्यात पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तात्काळ पोलिस व बचाव पथकाला माहिती देण्यात आली. * मृतदेह बाहेर काढून पंचनामा :- घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत धरणाच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. यावेळी कर्जत पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली आहे. * खोपोली येथील असल्याची प्राथमिक माहिती :- मृत तरुणी ही वासरंग, खोपोली येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिचे नाव वैशाली हरिश्चंद्र जाधव असे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृत ओळख पटविण्याची प्र...

खोपोली - वासरंग तांबडीतील प्राचीन परशुराम मंदिराचा जिर्णोद्धार

Image
  * स्वयंसेवकांचा प्रेरणादायी उपक्रम : श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान व गोवंश सुरक्षा समिती खालापूर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन खालापूर / सुधीर देशमुख :- खोपोली येथील वासरंग - तांबडी परिसरातील प्राचीन श्री भगवान परशुराम मंदिराचा जिर्णोद्धार, स्वच्छता व संवर्धनाचा उपक्रम श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान, गोवंश सुरक्षा समिती खालापूर आणि वासरंग - तांबडी ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून गडकोट स्वच्छता, संवर्धन व ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याचे कार्य करणाऱ्या श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठानने या उपक्रमातून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. * गडदुर्ग, बारव, विरगळ, सतीशिळा जतनाचे सातत्यपूर्ण कार्य :- श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान गेली कित्येक वर्षे गडकोटांवरील स्वच्छता, गडदुर्गांचे संवर्धन, ऐतिहासिक मंदिरे, बारव, विरगळ व सतीशिळा यांसारख्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे कार्य करीत आहे. एकविरादेवी, आळे फाटा येथील रेडा समाधी, साजगाव, कराडे, मोहोपाडा आदी ठिकाणी जाऊन गडदुर्ग, बारव व भुईकोटांची डागडुजी, साफसफाई व ...

खालापूर तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना अद्याप न्याय नाही

Image
  * डोणवत येथील शेतजमिनींवर जाण्यास अडथळे ; भीम आर्मीकडून ‘रस्ता परिषद’ घेऊन मोठ्या आंदोलनाची तयारी खालापूर / सुधीर देशमुख :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील डोणवत गावातील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीवर जाण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळे निर्माण होत असल्याने शेतकरी प्रचंड अन्यायाच्या छायेत जगत आहेत. कायदेशीर मालकी असूनही नामवंत कंपनी गोदरेज अँड बॉईज यांच्या व्यवस्थापनाकडे वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतीत जाण्याचा मार्ग उपलब्ध होत नसल्याने ही बाब अत्यंत गंभीर आणि शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. * निवेदने, आंदोलने करूनही प्रशासनाची उदासीनता :- या प्रश्नावर आदिवासी शेतकऱ्यांनी व भीम आर्मी संघटनेने वेळोवेळी आंदोलने, निवेदने व प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे शेतकऱ्यांचा संयम सुटत असून, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. * कोकणात प्रथमच ‘रस्ता परिषद’ :- या पार्श्वभूमीवर भीम आर्मी स...

सुभाषनगरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

Image
  * महिलांच्या तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद : हुमाना पीपल टु पीपल इंडिया, मर्क स्पेशालिटीज यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृतीचा उपक्रम खोपोली / मानसी कांबळे :- हुमाना पीपल टु पीपल इंडिया आणि मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड (मुंबई - खोपोली) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट लीडर विठ्ठल ठाकरे यांच्या पुढाकाराने सुभाषनगर गणपती मंदिर परिसरात शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि तपासणीसाठी राबविण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, स्तन तपासणी, नेत्र तपासणी तसेच महिलांसाठी गर्भाशयमुख कॅन्सर (Cervical Cancer) तपासणी करण्यात आली. विविध आजारांवरील प्राथमिक तपासणी व तज्ज्ञ डॉंक्टरांकडून मार्गदर्शन देण्यात आले. गरजू रुग्णांना अल्प दरात चष्मेही उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात डॉं. तृप्ती पोयरेकर (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), डॉं. सिमरन थोरात (कॅंन्सर तज्ज्ञ), डॉं. निधी अग्रवाल, डॉं. योजना तळपडे यांनी महिलांची सविस्तर तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. ...

पळसदरीजवळ रुळांवर भडकली आग...

Image
  खोपोली - सीएसएमटी लोकल थांबवून मागे वळवली सुक्या गवताला भीषण आग लागल्याने ट्रॅकवर धुराचे लोट ;   मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला खोपोली / मानसी कांबळे :- खोपोलीहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सीएसएमटी लोकलच्या प्रवाशांचा आज दुपारी काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी खोपोली रेल्वे स्थानकातून रवाना झालेली लोकल पळसदरी स्थानकाच्या आधी पोहोचण्याच्या मार्गांवर असताना रुळांच्या कडेला असलेल्या सुक्या गवताला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीचे लोंढे ट्रॅकपर्यंत येऊन धुराचे मोठे लोट पसरले. * मोटरमनची तत्परता, संभाव्य अपघात टळला :- समोर पसरलेली आग आणि दाट धूर पाहून मोटरमनने प्रसंगावधान राखत तातडीने लोकल जागीच थांबवली. पुढील धोका लक्षात घेऊन लोकलला पुढे न नेता सुरक्षित अंतरावरून मागे वळविण्यात आले. मोटरमनच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अपघात टळला असला तरी लोकलमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. * आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट :- ही आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कुणी जाणीव...

निरामय हेल्थ फाउंडेशनचा गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव....

Image
  खालापुर कर्जत/ सुधीर देशमुख : - गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने आयोजित CSR Partners Meet 2026 कार्यक्रमात निरामय हेल्थ फाउंडेशनच्या कामाची दखल घेऊन सन्मानचिन्ह देऊन गौरवले. संस्थेच्या मानद संचालक जयश्री पटवर्धन, CEO डॉ. क्षमा निकम, कार्यक्रम अधिकारी दीप्ती मथुरे, प्रकल्प समन्वयक मंगेश भंडारे आणि समुदाय लाभार्थी रेखा जाधव यांची उपस्थिती होती. डॉ. क्षमा निकम यांनी संस्थेच्या उद्दिष्टांवर आणि समुदायावर झालेल्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकला. रेखा जाधव यांनी गावपातळीवरील उपक्रमांचा लाभ सांगितला. संस्थेच्या कार्याला गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने सन्मानचिन्ह देऊन गौरवले, ज्यामुळे संस्थेला नवी ऊर्जा मिळाली. 

रायगडमधील लाल बावटा उतरला!

Image
  * शेकापच्या बालेकिल्ल्यांचे राजकीय अस्तित्व ढासळले! * जिल्हा परिषदेत शून्य जागा, अलिबाग पंचायत समितीही हातातून गेली * सोनेरी काळातून अस्तित्वाच्या लढाईपर्यंतचा आजचा प्रवास रायगड / सुधीर देशमुख :- रायगड जिल्ह्यात तब्बल तीन दशके राजकारणावर वर्चस्व गाजविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) प्रभाव आता इतिहासजमा होत असल्याचे चित्र अलीकडील निवडणूक निकालांतून स्पष्ट झाले आहे. एकेकाळी पनवेल, अलिबाग, पेणसारख्या प्रमुख मतदारसंघांत आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सहकार क्षेत्रावर लाल बावटा फडकविणाऱ्या शेकापला आज जिल्हा परिषदेच्या 59 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. 1965 पासून ताब्यात असलेली अलिबाग पंचायत समितीही पक्षाला राखता आलेली नाही. शेकापचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अलिबाग - मुरूड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या नऊच्या नऊ जागा शिवसेनेने जिंकत शेकापच्या अधोगतीवर शिक्कामोर्तब केला आहे. याबाबत एस. एम. देशमुख यांनी आपल्या लेखाबाबत शेकापचा इतिहास मांडतानाच अधोगतीची कारणे मांडत पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम केले आहे.  * 1994 ते 2012: शेकापचा ‘सो...

जिल्हा परिषदेत खालापूर तालुक्यात संमिश्र निकाल

Image
  * जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक 2026 * खालापूर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व * जि.प.मध्ये भाजप, उबाठा, शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी महत्त्वाच्या जागांवर यश खालापूर / मानसी कांबळे :- जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच केवळ खालापूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडल्यापासून उमेदवार, नेते, कार्यकर्ते आणि मतदारांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागून राहिले होते. खालापूर पंचायत समितीवर कौल नेमका कुणाच्या बाजूने लागणार ? निकाल जाहीर होताच या प्रश्नाचे चित्र स्पष्ट झाले असून तालुक्यात भाजप, शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांना संमिश्र यश मिळाले आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट वर्चस्व न मिळाल्याने आगामी काळात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. * पंचायत समिती निवडणुकीत संमिश्र यश :- खालापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या जागांवर विविध पक्षांनी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. चांभार्ली -...

जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुक 2026

Image
  कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा दणदणीत विजय नरेश जाधव / कर्जत: - कर्जत तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026 च्या निवडणुकांमध्ये परिवर्तन विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत तालुक्याच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बहुसंख्य जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उबाठा गट व मित्रपक्षांच्या उमेदवारांनी विजय मिळवून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. जिल्हा परिषद निवडणूक निकालानुसार, कळंब जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांनी शिवसेनेच्या हरिश्चंद्र निरगुडांवर २३४ मतांनी विजय मिळवला. कशेळे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुरेश दोरे यांनी ३७१९ मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. नेरळ जिल्हा परिषद गटात उबाठा गटाच्या सुनिता रोहिदास मोरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर ८८३ मतांनी मात केली. कडाव गटातून उबाठा गटाचे मारुती घारे विजयी ठरले. माणगाव तर्फे वरेडी गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी केवळ १९ मतांच्या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. मोठे वेणगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा अंकुश ठोंब...

सुभाषनगर येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Image
  * रमाई महिला मंडळ व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचा पुढाकार ; धम्मपूजा, प्रतिमापूजनाने कार्यक्रम संपन्न खोपोली / मानसी कांबळे :- सुभाषनगर रमाई महिला मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांच्या संयुक्त आयोजनातून डॉं. बाबासाहेब आंबेडकर भवन, सुभाषनगर येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माता रमाई, डॉं. बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सुगंध पूजनाने झाली. उपासिका भावना ओव्हाळ यांनी विधिवत धम्मपूजा करून उपस्थितांना धम्मविचारांचे महत्त्व पटवून दिले. या प्रसंगी माता रमाई यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या त्यागमय जीवनाचा उपस्थित महिलांनी भावपूर्ण शब्दांत गौरव केला. कार्यक्रमास गीता कांबळे, जयश्री गायकवाड, गीता मर्चंडे, शांता कवडे, कविता गायकवाड, प्रभा गवळे, स्वाती गिलबिले, राजश्री गिलबिले, सविता गिलबिले, नीलम कोळी, लता जाधव, पाटील ताई, सोनावणे ताई, लता खेडकर यांच्यासह सुभाषनगर परिसरातील महिला ग्रामस्थ व बचत गटातील असंख्य महिला ...

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान, मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला भेट....

Image
  रायगड / प्रतिनिधी :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्राची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड, वरसोली, सेंट मेरी हायस्कूल मतदान केंद्रे तसेच नेहुळी येथील मतमोजणी केंद्र, साहित्य वितरण केंद्र, स्ट्राँग रूमची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र शेळके, अलिबाग निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्णतः सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हील चेअर, प्रथमोपचार किट, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी बैठक व्यवस्था आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत...

छत्रपती शाहू महाराज शाळेत पार पडला ''हॅपी स्कुल " चा अनोखा उपक्रम...

Image
  खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- छत्रपती शाहू महाराज शाळेला "हॅपी स्कूल" म्हणून सजवण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हिल क्लबच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सावित्री रघुपती यांनी केले. शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी याचे प्रशिक्षण हिंदवी शाह यांनी दिले. कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांना पेन व बिस्किटे वाटण्यात आली. शाळेला स्पोर्ट्सचे साहित्य, पुस्तके, 2 व्हाईट बोर्ड आणि बोलक्या भिंती रंगवून देण्यात आल्या. ही सेवा इनरव्हिल क्लब खोपोलीच्या सदस्या आणि क्लबच्या डोनेशनमधून करण्यात आली.  कार्यक्रमाला अध्यक्ष दिना शाह, आयपीपी जयश्री कलोशी, सेक्रेटरी मधुमिता पाटील, डॉ. सावित्री रघुपती, आयएसओ वर्षा शिवलकर, दिव्या मश्रू, रमिला पटेल, सारिका धोत्रे, डॉ. अर्चना जाखोटिया, अरुणा, तारा आणि मनीषा उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक बिचकर सर आणि शिक्षकही उपस्थित होते.