कर्जतच्या भालिवडीत कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर
श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार"
रायगड/अलिबाग :- कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत कर्जतचे तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन होताच आश्रमशाळेतील लेझीम पथकाने पारंपारिक थाटात त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील 'अखंड भारताच्या' नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी तिरंगी रंगांच्या टोप्या व फुगे घेऊन अखंड भारताच्या नकाशाच्या सीमारेषेवर उभे राहून प्रत्यक्ष तिरंग्याचेच स्वरूप साकारले होते.
या प्रदर्शनात एका विद्यार्थिनीने श्री गुरु तेग बहादूर यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून या दिनाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.
याच सोहळ्यादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी या आयोजनामागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विद्यार्थिनींना थोर पुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत मोलाचे मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Comments
Post a Comment