खोपोलीत नागरिकांच्या एकतेचा विजय!
सभागृहापासून रस्त्यावरच्या लढ्यापर्यंत
* डंपिंग ग्राउंड हटवून पर्यटन स्थळाची घोषणा
* सुभाषनगरवासीयांनी लिहिला नवा इतिहास
खोपोली / मानसी कांबळे :- “एकता हीच शक्ती” हा केवळ बोधवाक्य नसून सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांनी तो प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. खोपोलीतील डंपिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिकांनी सुरू केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून, संबंधित जागेवर कचरा डेपो रद्द करून पर्यटन स्थळाचा आराखडा मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक मंगेश नारायण दळवी यांनी दिली.
सुभाषनगर परिसरात कचरा डेपोसाठी प्रस्ताव दाखल झाला होता. दुर्गंधी, प्रदूषण, आरोग्याच्या धोक्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या नाराजीला खतपाणी घालणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी नागरिक गेली अनेक महिने संघर्ष करीत होते. अखेर सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि आवाज बुलंद केला व निर्णय बदलला.
* जनतेच्या एकतेचा पराक्रम :- “आम्ही हक्क मागितला, सरकारने ऐकले” डंपिंग ग्राउंडविरोधातील चळवळीचे नेतृत्व स्थानिक नागरिकांसोबत नगरसेवक मंगेश दळवी यांनी केले. त्यांचा ठाम दावा आहे की, आपण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. निवेदने, बैठका, स्थानिक प्रशासनाशी चर्चा, सोशल मीडिया मोहिम आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा या सर्वांचा परिणाम अखेर मिळाला आहे.
* डंपिंग ग्राउंड ऐवजी ‘पर्यटन स्थळ’ :- खोपोली परिसर पर्यटन नकाशावर वेगाने पुढे सरकत आहे. या ठिकाणी आता पर्यटन विकास आराखड्याचा समावेश करण्यात येणार असल्याने परिसराचे रूपांतर घडणार आहे. हे केवळ एका निर्णयाचे उलटणे नाही तर खोपोलीकरांच्या भविष्याचा मार्ग बदलणारी घटना आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home