Sunday, February 1, 2026

खोपोली नगर परिषदेचे 6 आरटीआय अर्ज फेटाळल्याने खळबळ

 


माहिती लपवली जात आहे का ? डॉं. रियाज पठाण यांचा गंभीर सवाल

* केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्षाचा आरोप


खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषद यांनी केंद्रीय माहिती आयोगाच्या स्पष्ट आदेशांचा योग्य अभ्यास न करता तब्बल सहा आरटीआय अर्ज थेट फेटाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.


या प्रकरणावर तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत डॉं. रियाज पठाण यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. नगर परिषद माहिती का लपवत आहे ? नेमके कोणते घोटाळे झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे ? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील कारणे संशयास्पद असून यातून काहीतरी दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.


माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना सार्वजनिक माहिती मिळणे हा मूलभूत हक्क आहे, असे असतांना केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश डावलून आरटीआय अर्ज नाकारणे म्हणजे कायद्याचा अवमान असून लोकशाही व्यवस्थेलाच धक्का देणारी बाब असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.


डॉं. रियाज पठाण यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक व निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा नगर परिषद प्रशासनातील संभाव्य गैरप्रकार कधीच जनतेसमोर येणार नाहीत. पूर्ण चौकशीशिवाय हे प्रकरण शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


दरम्यान, या प्रकरणामुळे खोपोलीतील प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली असून नगर परिषद प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का, की प्रकरण दडपले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आरटीआय अर्ज फेटाळण्यामागील नेमकी कारणे स्पष्ट करणे आता नगर परिषदेपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home