रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा पेण महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा..
वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव
समस्यांचा वाचला पाढा
खालापुर/सुधीर देशमुख :- रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा पेण महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अशोक मोकल, के बी पाटील, के.जी.पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्च्यात उपस्थित होते.
आगामी येणाऱ्या गणेशोत्सव सणासुदीच्या काळात पेण तालुक्यात वीज समस्येने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जिते, वडखळ, शिर्की, बोरी, कारावी, हमरापूर या विभागातील जनता वीज वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झाली आहे. खंडित वीजपुरवठा, नादुरुस्त, धोकादायक विद्युत उपकरणे यामुळे जनतेच्या जीविताला धोका निर्माण झाला असून ग्रामीण भागात सततचा 7 ते 8 तास खंडित होणारा वीजपुरवठा याचा आर्थिक फटका गणपती मूर्तिकार तसेच छोट्या उद्योगांना बसत आहे. वीज वितरण कंपनीकडून जुने विद्युत मीटर बंद( फॉल्टी) दाखवून सक्तीने बसविण्यात येणारे नवीन स्मार्ट मीटर त्याचे पडणारे डबल युनिट आणि देण्यात येणारे भरमसाठ विद्युत बिल, विद्युत् बिलामध्ये स्थिर आकार,इंधन आकार,वाहन आकार व इतर छुपे आकार लावून ग्राहकांना बिलाचे दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पेण तालुक्यातील जिते, वडखळ, वाशी, वढाव, शिर्की, बोरी, कारावी, हमरापूर,दादर, झोतीरपाडा, शिहू या विभागातील जनता वीज वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झाली आहे. महावितरण कंपनीचे कर्मचारी रिडिंग न घेता अंदाजे युनिट देऊन बिल देत आहेत त्याचा भूदंड सर्व सामान्य वीज ग्राहकांना बसत आहे.
या सर्व समस्येविरोधात पेण तालुक्यातील वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात वीज महावितरण चुकीच्या पद्धतीने देण्यात येणाऱ्या वीज बिलाबद्दल
समस्यांबद्दल बनविलेले घोषवाक्य फलक होते. उत्स्फूर्तपणे नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना श्री.संजय जांभळे यांनी वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचा यावेळी पाढा वाचण्यात आला.
श्री.संजय जांभळे यांनी मागणी केलेल्या 10 समस्यांवर वीजमहावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. कुणीही अवाजवी बिल आल्यास ते संबंधित विभागातील वीज अधिकारी यांचेकडून कमी करून घ्या. स्मार्ट मीटर बसविणे कायद्याने बंधनकारक नाही. वीज ग्राहक कायद्यानुसार वीज ग्राहकांना कोणता मीटर बसवायचा हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार आहे.
त्यामुळे कोणीही सक्तीने स्मार्ट मीटर बसवून घेऊ नये. त्यानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली.


Comments
Post a Comment